जळगाव जिल्हा प्रतिनिधी, रावेर.
रावेर तालुका आणि परिसरातील गावांमधून दररोज शेकडो भाविक व वारकरी संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जात असतात. शेगाव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असूनही, रावेर येथून थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने वारकरी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना, खासगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागतो किंवा अनेक ठिकाणी गाड्या बदलत शेगाव गाठावे लागते. यामुळे त्यांना शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांच्या मागण्या:-
१. थेट बस सेवा: रावेर आगारातून सकाळी लवकर सुटणारी ‘रावेर-शेगाव’ ही थेट बस सेवा प्राधान्याने सुरू करावी.
२. नियोजित मार्ग: सदर बस मुक्ताईनगर व मलकापूर मार्गे नेल्यास महामंडळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि उत्पन्नातही मोठी भर पडेल.
३. लोकभावना: आपल्या कार्यक्षेत्रातील भाविकांची सोय करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.
तरी आपण या लोकभावनेचा सन्मान करून ही बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी. आपल्याकडून सकारात्मक कार्यवाहीची आणि वारकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
