जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. विशेष वृत्तांत
राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार हे केवळ व्यक्तीविरोधी हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत.

पत्रकारांनी निर्भयपणे काम करता यावे, यासाठी त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे आणि अशा घटनांतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील तसेच कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे ठोस निर्देश
▪ पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
▪ संबंधित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून अटक करावी.
▪ पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
▪ पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
▪ पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारावी.
“पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देणे होय. अशा कृत्यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे.” – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
