विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जामनेर : जामनेर तालुक्यातील महुखेडा येथील शेतकरी रमेश पवार यांनी गारखेडा शिवारातील आपल्या चार एकर क्षेत्रातील कपाशीच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केले. पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीचे पीक करपू लागल्याने आणि उत्पादनाची आशा मावळल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
रमेश पवार यांनी गारखेडा शिवारात चार एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती. बियाणे, खते, निंदणी, फवारणी आणि इतर मशागतीसाठी मोठा खर्च करण्यात आला होता. मात्र, पावसाचा खंड वाढल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आणि पिकांची वाढ खुंटू लागली.
उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने आणि केलेला खर्चही वसूल होण्याची आशा धूसर झाल्याने महुखेडा येथील शेतकरी रमेश पवार यांनी गारखेडा शिवारातील उभ्या कपाशीच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला.
या घटनेमुळे परिसरातील खरीप पिकांची गंभीर परिस्थिती समोर आली असून, वेळेत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
