अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
चिंचविहीरे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहीरे येथे उभारण्यात आलेल्या शौचालयाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे छायाचित्रांमधून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या शौचालयाचा प्रत्यक्षात मुलांना कोणताही लाभ होत नसल्याचा आरोप होत असून, संपूर्ण शाळेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक ठरत आहे.


शाळेतील शौचालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, घाण आणि दुर्गंधीची परिस्थिती दिसून येत आहे. फरशा मळलेल्या असून भिंतींवरही अस्वच्छतेचे डाग स्पष्टपणे दिसतात. काही ठिकाणी दरवाजे व त्यावरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयातील स्वच्छताविषयक सुविधा देखभालीअभावी खराब झाल्याचे चित्र आहे.


विशेष म्हणजे, शाळेच्या भिंतीवर ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सामुदायिक शौचालय बांधणे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, शौचालयाची प्रत्यक्ष स्थिती पाहता योजनेचा उद्देश आणि जमिनीवरील वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते.


शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय ही मूलभूत गरज आहे. मात्र, सुविधा उभारल्यानंतर तिची नियमित स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल झाली नाही तर शासनाचा खर्च आणि योजनेचा उद्देश दोन्ही व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.


या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, शिक्षण विभाग तसेच प्रशासनाने या शौचालयाची तातडीने पाहणी करून स्वच्छता, दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.


शासकीय निधीतून उभारलेल्या सुविधेचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतोय का? देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!