जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
तिरंगा रॅली, चित्रकला, तिरंगा राखी व तिरंगा रांगोळी या उपक्रमांमधील 400 विद्यार्थांच्या सहभागाने दिला देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जाणिवेचा प्रभावी संदेश

भारत देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाभिमान देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या हेतूने जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालया तर्फे “हर घर तिरंगा, हर मन तिरंगा” या शासकीय उपक्रमांतर्गत देशभक्तीच्या उत्तुंग उत्साहात 300 फूट लांब “भव्य तिरंगा रॅली”, तिरंगा चित्रकला “, तिरंगा राखी,” व “तिरंगा रांगोळी” या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे N.C.C. पथकातील विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सन्मानाने व शिस्तीने 300 फूट लांबीच्या भव्य आणि देखणा तिरंगा ध्वजाचे सादर केलेले देशभक्तीपर प्रदर्शन!

“तिरंगा चित्रकला “उपक्रमात 140 विद्यार्थांनी सहभाग घेऊन तिरंगा ध्वजाचे सुंदर चित्र काढून, आकर्षक पद्धतीने रंगवून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. तसेच “तिरंगा राखी बनविणे ” या उपक्रमात 150 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून घरातील विविध वस्तूंचा वापर करून आकर्षक राख्या बनविल्या. त्यात प्रामुख्याने तांदूळ, डाळ, पिस्ता साल, कागद, रंगीत दोरा, पाईप क्लिनर, इयर बड्स, स्पंज, लोकर, काडीपेटी तील काड्या, रंगीत फुले, टिकली, मणी, कुंदन लेस यांचा वापर करून विलोभनीय राख्या बनविल्या.

या हस्त कला विकास आधारित उपक्रमांचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, पर्यवेक्षक श्री. जगदीश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस N.C.C .विभाग प्रमुख श्री. श्रीकांत घुगे, सौ.कविता कुऱ्हाडे सौ.नीलिमा सपकाळे, श्री.प्रेम सारस्वत, श्रीमती योगिता महाजन, सौ.योगिता तडवी, सौ.वृषाली पाटील, सौ.सुवर्ण वंजारी, सौ.रुपाली महाजन, सौ.यामिनी चौधरी, सौ. मनिषा पवार, आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री. उल्हास ठाकरे, सौ.पद्मजा जोशी आदी मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. सहभागी विद्यार्थांना या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, बलिदान व राष्ट्रप्रेम आणि शिस्तीचे महत्त्व याबाबत माहिती देऊन विद्यार्थांनी देशविकासात सहभागी होण्याचे आवाहन केले. ” तिरंगा रांगोळी” उपक्रमात 20 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून सुबक तिरंगा रेखाटून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वरील सर्व देशभक्तीपर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.

