गजवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज : महामंत्री प्रदीपभाई बरडिया
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा – श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ, मालेगाव यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, चोपडा येथे आदिवासी व गरीब विद्यार्थिनींना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य मिळूनही देशात अजूनही अनेक जण अन्न, वस्त्र व निवाऱ्यापासून वंचित आहेत. विशेषतः आदिवासी गोरगरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत असतानाही त्यांच्या अंगावर नीटनेटके वस्त्र राहत नाही, ही बाब मनाला अस्वस्थ करणारी आहे. या दूरगामी विचाराने संघाचे महामंत्री व दातृत्वशील व्यक्तिमत्त्व श्री प्रदीपभाई मिलापचंद बरडिया यांच्या शुभहस्ते गरजवंत आदिवासी विद्यार्थिनींना वस्त्रदान करून मोलाचा हातभार लावण्यात आला.
यावेळी बोलताना श्री प्रदीपभाई बरडिया म्हणाले, “आज केवळ झेंड्याला सलाम करून स्वातंत्र्यदिन साजरा करणे पुरेसे नाही. उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणेही तितकेच आवश्यक आहे. खऱ्या गरजूंना योग्य मदत देऊन त्यांना पुढे आणणे हेच खरे मानवार्थ आहे. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ असल्याने ज्याकडे आहे त्याने काही तरी देण्याची भावना बाळगल्यास गरीबही स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.”
कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य डॉ. रामलालजी जैन, सदस्य श्री संजय चंपालालजी बरडिया, सदस्य शैलेश पारसमलजी जैन, महाराष्ट्र नवयुवक शाखा कार्यकारिणी सदस्य श्री नितीन मिलापचंदजी जैन, श्री आकाश प्रदीपजी जैन तसेच कमला नेहरू मुलींचे वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, अधीक्षिका कावेरी कोळी, कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या उपक्रमाद्वारे संघाने स्वातंत्र्यदिनाच्या खऱ्या अर्थाने साजरा करत समाजसेवेची एक आदर्श परंपरा पुढे नेली आहे.
