जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगांव : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जळगांवातील जागरूक नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत शांततापूर्ण पण प्रभावी निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनात विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील जाणकार तसेच विविध विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र शासनाने तातडीने लक्ष द्यावे, शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली.
निदर्शना दरम्यान “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “शिक्षण व्यवस्था सुधारा”, “लोकशाहीचा सन्मान करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हाताळण्यात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उपस्थितांनी मत व्यक्त केले की, विद्यार्थ्यांचे भविष्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण हा केवळ एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे. देशातील युवकांच्या अपेक्षा, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि पर्यावरणीय प्रश्न यावर शासनाने सकारात्मक संवाद साधून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
निदर्शनानंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

जळगावातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी पक्षीय भेद विसरून एकत्र येत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नावर व्यक्त केलेली एकजूट ही लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि समाजाच्या जागरूकतेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
एकंदरीत, आजची निदर्शने शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रभावी वातावरणात पार पडली असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जळगावकरांनी व्यक्त केलेली संवेदनशीलता आणि सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

या प्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, प्रमोद पाटील,सौ. मंगला पाटील, जमील शेख, अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, विराज कावडीया, विनोद शिंदे, निवृत्त प्राचार्य एस एस राणे, निवृत्त प्राचार्य राजकिशोर गुप्ता, शिवराम पाटील, किरण तळले, मुकुंदा रोटे, रिजवान जहागीरदार, ज्ञानेश्वर पाटील, संजू जमादार, सुनील माळी, ललित शर्मा, मुजीब पटेल, राजेंद्र निकम, चेतन पवार, अनंत परिहार, विष्णू धांडे व विविध सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
