मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५ हजार वृक्षांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल सहा महिन्यांत प्राप्त होणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानसभा सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२६ च्या पावसाळ्यात सुमारे ताशी ८० ते ९० किमीपर्यंत वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईचे भौगोलिक स्वरूप, दाट लोकवस्ती, भूमिगत सेवा वाहिन्या आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे वृक्षांच्या मुळांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होऊ नये, यासाठी महानगरपालिका विशेष काळजी घेत आहे. तसेच वृक्षांमध्ये अंतर्गत कुज किंवा संरचनात्मक दोष आढळल्यास वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाते.

या प्रकल्पासाठी “द स्माईल कॉन्सील” यांच्या माध्यमातून मे. ट्रीकोटेक एलएलपी या वृक्षतज्ज्ञ संस्थेची २१ मार्च २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. या मूल्यांकनामुळे धोकादायक वृक्षांची ओळख पटवून त्यांच्यावर वेळेत उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

भूमिगत सेवा वाहिन्यांच्या नियोजनासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावेळी डक्ट प्रणालीचा वापर करण्याचे प्रस्तावित असून, सेवा वाहिन्या टाकताना वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

प्रायोगिक प्रकल्पाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कार्यपद्धती मुंबईतील इतर भागातही राबविण्याचे नियोजन असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!