जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
महानगरपालिकेच्या अजब कार्यपद्धतीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. नुतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत मृत्यूला निमंत्रण देत असताना, प्रशासन मात्र ती दुरुस्त करण्याऐवजी लाखो रुपये खर्चुन रंगरंगोटी करण्यात मग्न आहे. वरतून कीर्तन आणि आतून तमाशा अशीच काहीशी अवस्था या उड्डाणपुलाची झाली असून, महापालिकेच्या या बेजबाबदारपणामुळे जालनाकरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरातील उड्डाणपुलांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. यामध्ये नुतन वसाहत उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतींना चकाचक रंग देण्यात आला. यासाठी जनतेच्या करातून जमा झालेला लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, याच पुलाची एक महत्त्वाची संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात तुटलेली आहे. चकाकणाऱ्या रंगाच्या आड लपलेला हा जीवघेणा खड्डा रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ ठरू शकतो.

प्रशासनाचा प्राधान्यक्रम चुकला की मलिदा लाटला?
सामान्य नागरिकांच्या मते, पुलाची भिंत दुरुस्त करणे ही प्राथमिक सुरक्षिततेची बाब होती. मात्र प्रशासनाचे लक्ष नागरिक सुरक्षेकडे नसून मलिदा लाटण्यात आहे, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत असून, आता तरी प्रशासन या विषयावर काय कार्यवाही करणार या कडे लागून आहे.
