विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
धरणगाव/चोपडा, दि. १९ (प्रतिनिधी) – गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी चोपड्याकडे निघालेल्या कुटुंबावर ३० ते ३५ जणांच्या जमावाने हल्ला करून बेदम मारहाण व लूटमार केल्याची धक्कादायक घटना रोटवद (ता. चोपडा) शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
धरणगाव शहरातील संजय नगर येथील रहिवासी शांताराम हिम्मत पाटील हे पत्नी अंजली पाटील, भाऊ रवींद्र पाटील आणि ७ वर्षीय मुलीसह वाहनाने चोपडा येथे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जात होते. रोटवद गावाजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर शांताराम पाटील यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्या वाहनातील ३० ते ३५ जणांच्या जमावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबातील तिघांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत जमावाने त्यांच्याजवळील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून नेल्याचा आरोप आहे.
ग्रामस्थ धावून आले, वाहनांची तोडफोड
कुटुंबाची आरडाओरड ऐकून रोटवद येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी कुटुंबाला जमावाच्या तावडीतून सोडवले. मात्र, संतप्त जमावाने ग्रामस्थांनी मदतीसाठी बोलावलेल्या वाहनांचीही तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले.
जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून हल्लेखोर जमावाचा शोध घेतला जात आहे.
