घनसावंगी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अल्प मानधन आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, किमान ३० हजार रुपये मानधनासह सेवा संरक्षण देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
ग्रामरोजगार सेवकांवर शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेशी संबंधित कामे, लाभार्थी नोंदी, कामांची पाहणी व अहवाल तयार करण्यासह विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. मात्र, या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामरोजगार सेवकांचे म्हणणे आहे.
कामाचा वाढता व्याप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन मानधनात वाढ करावी, किमान ३० हजार रुपये मानधन निश्चित करावे तसेच ग्रामरोजगार सेवकांना सेवा संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधले असून, शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
