प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे, मानवत | परभणी
मानवत : मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर किन्नर समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे सुमारे ८० टक्के, कापसाचे ७० टक्के तर मुगाचे ६५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिक गंभीर झाल्या आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
किन्नर समाजाच्या प्रमुख मागण्या :
मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपयांची मदत द्यावी.
पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत.
शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी किन्नर समाजाच्या प्रतिनिधींनी केली आहे. निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
