जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.

रा.प. जळगाव आगारातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संघटनेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. विभाग नियंत्रकांच्या दालनात कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने संघटनेने आमरण उपोषण तूर्त स्थगित केले होते. मात्र, प्रशासनाकडून प्रश्न सोडविण्यास उदासीनता दाखविली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित प्रश्न तीन दिवसांच्या आत निकाली न काढल्यास २० ऑगस्ट २०२६ पासून सकाळी ११ वाजता विभाग नियंत्रकांच्या विभागीय कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेने रा.प. जळगाव आगार व्यवस्थापकांच्या कथित मनमानी कारभाराची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना चुकीच्या ड्युट्या देऊन आर्थिक फायदा घेतल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच आगारात तीन वाहन परीक्षकांची पदे रिक्त असतानाही ती न भरता विशिष्ट कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सात कर्मचाऱ्यांना विनाकारण निलंबित केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निलंबन काळातील शिस्त व आवेदन कार्यपद्धतीचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावा करत संबंधित प्रकरणांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने निवेदनातून प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना, मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे म्हटले आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि संघटनेचे प्रस्तावित आंदोलन प्रत्यक्षात सुरू होते का, याकडे जळगाव आगारातील कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
