जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
रावेर :- केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला रावेर तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि लक्षणीय प्रतिसाद लाभला.

मोर्चात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून महिलांच्या सन्मानासाठी आपली एकजूट व्यक्त केली.
मोर्चानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी (नंदुरबार) यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

उपस्थित नागरिकांनी महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश दिला. रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात समाज एकसंघ असल्याचा संदेश या शांततापूर्ण मूक मोर्चातून देण्यात आला.

मोर्चा नियोजित वेळेवर सुरू झाल्यामुळे काही नागरिकांना वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे निवेदन सादर झाल्यानंतरही सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती, हे विशेष.
