विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

रामेश्वर कॉलनी-रेणुका नगर परिसरात खळबळ; संशयित ताब्यात

जळगाव: रामेश्वर कॉलनी, रेणुका नगर परिसरातील कविता अरुण मिस्तरी (वय ३८) या गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच पद्मालय परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित नरेंद्र अनिल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता मिस्तरी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या आढळून न आल्याने याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच पद्मालय परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख कविता मिस्तरी यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, कविता मिस्तरी यांची नरेंद्र अनिल सोनवणे याच्यासोबत काही वर्षांपासून ओळख होती, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोनवणे हा कविता यांच्या घरी आला होता. कविता यांच्या आईला दवाखान्यात घेऊन जायचे असल्याचे सांगून तो कविता यांना सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर कविता घरी परतल्या नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, कविता यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित नरेंद्र अनिल सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच कविता यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य समोर आणावे, अशी मागणी कविता यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!