विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
गृहप्रवेशानंतर नवरी घरातून पळाली, रस्त्यातच मृत्यूनं गाठलं
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकच्या मालेगावात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. पैशांसाठी लग्न लावून नवऱ्या मुलाला फसवल. नवरीने पळ काढला आणि रस्त्यातच मृत्यूने तिला गाठलं. अत्यंत भयानक पद्धतीने या नवऱ्यामुलीचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या डांग आणि वलसाड जिल्ह्यातून. निलुबेन (वय 32) या विवाहित तरुणीचे लग्न झालेले असतानाही, संशयित आरोपी शैलेशभाई लक्ष्मणभाई गावीत, प्रकाश आणि संजय सखाराम गांगुर्डे यांनी मिळून एक भयंकर कट रचला. निलुबेनचे पहिले लग्न लपवून तिचे निलुबेन संतोषभाई भोये असे बनावट नाव ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर, मुख्य सूत्रधार शैलेशभाई गावीत याने स्वतःचे नाव बदलून सुनील भोये’ असे सांगत तो निलुबेनचा भाऊ असल्याचा बनाव केला.
या टोळीने मालेगावच्या लुल्ले शिवारातील चैत्राम देविदास अहिरे नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले.मुलगी गरीब घराण्यातील आहे असे सांगून लग्न लावून देण्यासाठी तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड उकळली. 5 सप्टेंबर रोजी हे खोटे लग्न पार पडले आणि चैत्राम यांच्या पदरात फसवणूक पडली. लग्नाचा हा बनाव फार काळ टिकणारा नव्हता. कोणालाही थांगपत्ता लागू न देता, निलुबेनने त्या घरातून पळ काढला. ती जंगलाच्या रस्त्याने थेट आपल्या आईकडे जाण्यासाठी निघाली होती. रात्रीची वेळ आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांतता होती. निलुबेन सुटकेच्या आशेने धावत असतानाच, लुल्ले शिवारातील शेत गट क्रमांक 61 च्या फॉरेस्ट हद्दीजवळ पोहोचली.
तिथे शेतकरी भाऊसाहेब सोनु गायकवाड याने जंगली प्राण्यांना रोखण्यासाठी आपल्या शेताभोवती लोखंडी तारेचे कुंपण घातले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या तारेमध्ये त्याने बेकायदेशीरपणे थेट इलेक्ट्रिक करंट (विजेचा जिवंत प्रवाह) सोडला होता. या तारेला स्पर्श झाल्यास कोणत्याही माणसाचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही हा जीवघेणा ट्रॅप लावण्यात आला होता अंधारात पळत सुटलेल्या निलुबेनचा पाय किंवा हात या जिवंत विजेच्या तारेला लागला. एका क्षणात विजेचा तीव्र झटका बसला, थरकाप उडाला आणि जंगलाच्या त्या निर्जन सीमेवर निलुबेनचा दुर्दैवी अंत झाला.
सुरुवातीला हा निव्वळ एक अकस्मात मृत्यू (ED) वाटत होता. मात्र,पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मृत तरुणीची नातेवाईकांना शोधून काढले, तेव्हा यामागील फसवणुकीचे आणि मृत्यूचे भयंकर गुपित समोर आले. वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) योगेश जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नाव बदलून फसवणूक करणारे आणि शेतात मृत्यूचा सापळा रचणाऱ्या अशा सर्व 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध), 318(4) (फसवणूक) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयीन कोठडीत आता पोलीस या टोळीचे आणखी काय कारनामे आहेत, याचा कसून तपास करत आहे.
