विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

बोगस कॉलेजच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; बनावट पदवी व गुणपत्रिका देऊन लाखोंची लूट

छत्रपती संभाजीनगर : बोगस कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल करत बनावट पदवी व गुणपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी कॉलेज सुरू करून ॲनिमेशन आणि डिझायनिंगचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला होता. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून दरवर्षी सुमारे ३५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. वर्ग घेणे, परीक्षा घेणे तसेच त्यानंतर ‘एआय’च्या माध्यमातून तयार केलेली बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, संबंधित अभ्यासक्रमाला राज्यातील विद्यापीठाची मान्यता असल्याचे भासवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तीन वर्षे वाया जाण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक भवित्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

या प्रकरणाची तक्रार गारखेडा परिसरातील एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी यज्ञेश रामकृष्ण बार्हाते (वय ३३) आणि त्याची पत्नी रेणुका भाले, दोघेही सातारा परिसरातील रहिवासी, यांच्याविरुद्ध शुक्रवारी (११ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी रेणुका हिला ताब्यात घेतले असून, यज्ञेश बार्हाते याचा शोध सुरू आहे. या फसवणुकीत आणखी किती विद्यार्थी बाधित झाले आहेत आणि किती रकमेची फसवणूक झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!