प्रतिनिधी, किरण पाटील.
मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ₹ ५०,००० रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, याबाबत शिवसेना उबाठाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच पिकांना आवश्यक वेळी पुरेसा पाऊस न मिळाल्याने केळी, कापूस, मका,,सोयाबीन,तूर, ज्वारी बाजरी ,उडीद मुग, तीळ तसेच इतर स्थानिक हंगामी व बागायती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी तसेच सिंचनासाठी मोठा खर्च केलेला आहे. मात्र पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ,कर्जबाजारीपणा, यामुळे आत्महत्या करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.शिवसेना उबाठाच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या.
प्रमुख मागण्या
1. मुक्ताईनगर तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून दुष्काळसदृश/कोरडी परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.
2. तालुक्यातील सर्व गावांमध्ये व शेतशिवारांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
3. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही अनावश्यक अट न लावता सरसकट हेक्टरी ₹50,000 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी.
4. प्रलंबित पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
5. चालू वर्षातील पीक विम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य पीक विमा नुकसानभरपाई देण्यात यावी.
6. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्जमाफी करावी अथवा कर्जवसुलीस स्थगिती देण्यात यावी.
7. सिंचनासाठी शेतकऱ्यांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
8. नादुरुस्त अथवा अपुऱ्या क्षमतेच्या डीपी तातडीने दुरुस्त करून आवश्यकतेनुसार नवीन डीपी उपलब्ध करून द्याव्यात.
9. ई-पिक पाहणी तातडीने पूर्ण करून कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
10. दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी व आवश्यक शैक्षणिक सवलती द्याव्यात.
11. जनावरांसाठी आवश्यक प्रमाणात चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
12. तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तातडीने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात याव्यात.
13. मुक्ताईनगर तालुक्यातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून विशेष आर्थिक मदतीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा.
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. वरील मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
याप्रसंगी ॲड. राहुल अशोक पाटील तालुका प्रमुख मुक्ताईनगर, ॲड. देवेंद्र बोदडे तालुका समनवयक, ॲड. अशोक बोदडे तालुका प्रसिध्दी प्रमुख,अक्षय पालवे व वसीम मन्सुरी तालुका संघटक आदी उपस्थित होते.
