जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
झाडे लावणे सोपे असते, पण ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारणे तितकेच कठीण असते. अनेक हात वृक्षारोपणासाठी पुढे येतात, मात्र त्या रोपट्याला पाणी घालून, त्याची काळजी घेऊन त्याला वृक्षात रूपांतरित करणारे हात फार थोडे असतात. अशा मोजक्या संवेदनशील व्यक्तींमध्ये प्रदीप पाटील यांचे नाव आदराने घ्यावे लागेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले. हा केवळ वाढदिवसाचा उपक्रम नव्हता, तर शहर अधिक हिरवेगार आणि सुंदर करण्याचा एक सामाजिक संकल्प होता. या वृक्षांचे संगोपन आणि नियमित पाणी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वीकारली.
याच संकल्पाला अधिक बळ देत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी आणि निसर्गप्रेमी प्रदीप पाटील यांनी झाडांना पाणी देण्यासाठी दोन झाऱ्या भेट दिल्या. किंमत कदाचित छोटी असेल, पण त्यामागील विचार अत्यंत मोठा आहे. कारण वृक्षारोपणाच्या यशाचे खरे मोजमाप रोपे किती लावली यावर नसून ती किती जगली यावर ठरत असते.

आकाशवाणी चौकात झालेल्या या झाऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष किरण तळेले, डॉ. अनुज पाटील, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे तसेच चेतन पवार, सतीश सैदाणे, साजन पाटील, युसुफ खाटीक आणि विशाल ठाकूर उपस्थित होते. मात्र त्या प्रसंगी केंद्रस्थानी होती ती एका पर्यावरणप्रेमी मनाची संवेदनशीलता.
प्रदीप पाटील यांच्यामध्ये पर्यावरणाविषयीची आस्था, समाजाप्रतीची बांधिलकी आणि राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या पर्यावरण-जागृतीच्या संदेशाप्रती असलेली निष्ठा यांचा सुंदर संगम दिसून येतो. समाजात बदल घडविण्यासाठी मोठ्या घोषणांची गरज नसते; छोट्या कृतीही मोठा संदेश देऊन जातात. प्रदीप पाटील यांनी दिलेल्या या दोन झाऱ्या त्याचेच जिवंत उदाहरण आहेत.
आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. अशा वेळी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक हाताचे कौतुक व्हायला हवे. कारण झाडे लावणारे अनेक असतात, पण झाडे जगविण्यासाठी हातभार लावणारेच खरे पर्यावरण प्रेमी असतात.
प्रदीप पाटील यांच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमास मनःपूर्वक सलाम आणि भविष्यातही त्यांच्या हातून अशाच प्रेरणादायी कार्याची अपेक्षा. – ॲड जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगांव
