♦ जळगाव : – राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना आदिवासी गट आणि सर्वसाधारण गट अशा दोन गटांमध्ये राबविण्यात येते. यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पिकांसाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ आहे. पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये रक्कम राहिल.

तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकालात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षिस- पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस- तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस- दोन हजार रुपये असणार आहे.

तर जिल्हा पातळी वरील पहिले बक्षिस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस – सात हजार रुपये, तिसरे बक्षिस – पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षिस – पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस – चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये असणार आहे.

जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. तसेच भाग घेण्यासाठी व अधिकच्या माहिती साठी संबधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी कु.मु.तडवी यांनी केले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!