मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
श्री. जगदीश कदम हे मराठी साहित्य विश्वातील अत्यंत महत्वाचे नाव आहे. ते गेल्या ४५ वर्षांपासून अव्याहतपणे आपली सर्जनशील निर्मिती करीत आहेत.
स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ग्रामीण भागातील बदलत्या परिस्थितीचा वेध साहित्याद्वारे घेण्याचा प्रयत्न अनेक साहित्यिकांनी केल्याचे दिसते. मराठी वाड्:मयातील प्रवाहांमध्ये ग्रामीण साहित्य चळवळीचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. त्यातील ग्रामीण कवितेच्या चौथ्या पिढीचे कवी जगदीश कदम यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या ग्रामीण संवेदनशीलतेतून निर्माण झालेल्या कवितेचा मुख्य केंद्रबिंदू हा गावगाड्यातील बदलत्या वास्तवाचा वेध घेणे हा आहे त्यांनी गावगाड्याचे ‘अंतर्गत’ आणि ‘बहिर्गत’अशा स्वरूपाची मांडणी मोठ्या कलात्मकरित्या घडवलेली आहे. आणि जगदीश कदम यांची कविता : स्वरूप आणि आस्वाद हा समीक्षा ग्रंथ वाचकांच्या भेटीला आला आहे. तो वाचकांच्या हाती दिला आहे आमच्या अंबड तालुक्यातील बेलगाव सुखापुरीचे प्रा. श्री. गणेश मोताळे सर यांनी.
हा ग्रंथ विद्यार्थी,वाचक,लेखक,समीक्षक यांच्या हाती देतांनाचा आनंद व्यक्त करत विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त व वाचनीय ठरेल ही खात्री लेखकाने मनोगतात व्यक्त केली आहे.

प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण सर यांनी या समीक्षा ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तुत ग्रंथ निर्मल प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केला आहे.
श्री. गणेश मोताळे यांनी एकूण पाच प्रकरणातून अभ्यासपूर्ण लेखन केल्याचे दिसते.
वाचकांनी अवश्य हा ग्रंथ वाचावा आणि या उमद्या लेखकाला पुढील लेखनासाठी प्रोत्साहित करावे.
