विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

चाळीसगाव वनपरिक्षेत्रात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त; न्यायालयाकडून ३ दिवसांची वन कोठडी

चाळीसगाव, दि. १७ – गौताळा अभयारण्याच्या चाळीसगाव वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीच्या प्रकाराला वन विभाग आणि Crime & Corruption Control Association (CCCA) च्या संयुक्त पथकाने चाप लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पाच दिवस सखोल पाळत ठेवून करण्यात आलेल्या या धडक कारवाईत ६१ लाकडी बल्ल्या जप्त करण्यात आल्या असून, तिघा तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वन विभागाला गौताळा अभयारण्यात जिवंत झाडांची कत्तल करून सागवान व अंजन लाकडाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे CCCA च्या पथकाने सलग पाच दिवस हालचालींवर लक्ष ठेवले. खातरजमा झाल्यानंतर वन विभागाच्या समन्वयाने सापळा रचून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एकूण ६१ बल्ल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८ सागवान आणि ५७ अंजनाच्या बल्ल्यांचा समावेश आहे. तस्करीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर (MH 19 CV 4603) आणि ट्रॉली (MH 19 E 2685) देखील जप्त करण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी –

१. गोकुळ आनंदा गोपाळ (वय ४०, रा. बोदरा)

२. अरविंद विजय जाधव (वय २०, रा. बोदरा)

३. निलेश एकनाथ राठोड (वय २५, रा. बोदरा)

तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१)(फ)(ड), ४१ व ४२ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती CCCA ने दिली.

दरम्यान, हा तपास केवळ तिघांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तस्करी साखळीपर्यंत नेण्याची मागणी CCCA ने केली आहे. आरोपींच्या मोबाईलचे मागील सहा महिन्यांचे CDR तपासून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वन गुन्ह्यांमध्ये अनेकदा कागदपत्रांतील त्रुटींमुळे आरोपींना कमी शिक्षा होते, त्यामुळे सर्व कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काटेकोर पडताळणी करूनच न्यायालयात सादर करावीत, असेही CCCA ने म्हटले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!