३ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नातेवाईकांचे तीव्र धरणे आंदोलन
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना जिल्ह्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील ३४ वर्षीय तरुण कैलास गुलाब गिरी यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर शेतशिवारात आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असतानाच, टेंभुर्णी पोलिसांच्या अंगावर काटा आणणाऱ्या संवेदनहीनतेमुळे आणि दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पतीची हत्या झाल्याचा थेट आरोप मृत कैलास यांच्या पत्नी ज्योती गिरी यांनी केला आहे. मात्र, या गंभीर प्रकरणात संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी, पीएम रिपोर्ट आल्यानंतर पाहू, अशा छोट्या-मोठ्या गोष्टी होत राहतात ! असे अत्यंत बेजबाबदार आणि निर्लज्ज वक्तव्य टेंभुर्णी पोलिसांनी केल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे. हद्दीत एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू होतो आणि पोलीस त्याला ‘छोटी-मोठी गोष्ट’ म्हणतात, यावरून पोलिसांची गुन्हेगारांशी असलेली पाठराखण स्पष्ट उघड होते.
