अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
राहुरी तालुक्यातील सडे गावातील महादेववाडी येथे पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना ७ जून रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुनील भानुदास बर्डे यांचा मृत्यू झाला असून दोन आरोपींना राहुरी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सडे गावातील महादेव मंदिरासमोर सुनील भानुदास बर्डे यांचा लक्ष्मण भाऊसाहेब माळी, सुनील गंगाधर पवार आणि सागर सुभाष बर्डे यांच्याशी पैशाच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद पुढे गंभीर स्वरूप धारण करत मारहाणीत बदलला.

यावेळी आरोपींनी सुनील भानुदास बर्डे यांच्या डोक्यात लाकडी खनपुटाच्या दांडक्याने जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सुनील बर्डे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सुनील साईनाथ बर्डे यांनाही आरोपींनी कपाळावर दगड मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत लक्ष्मण भाऊसाहेब माळी. आणि सुनील गंगाधर पवार. सागर सुभाष बर्डे या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलीस सहाय्यक निरीक्षक गणेश वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना तात्काळ अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले.
या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे, प्रमोद ढाकणे, कुऱ्हाडे साहेब आणि भाऊसाहेब शिरसाठ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे, राहुरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत घडलेला हा तिसरा खून असून सर्वच गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अल्पावधीत अटक केल्याने पोलीस प्रशासनाच्या तत्परतेची चर्चा होत आहे.
