मुंबई : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत – जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

सरदार@150 एकता मोहिमेचा भव्य शुभारंभ
या मोहिमेअंतर्गत “विकसित भारत पदयात्रा” उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती, एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव, राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे, नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार@150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे. या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणे, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे. राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हा स्तरावरील पदयात्रा (31 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2025)
प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, आत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरिता आयोजक म्हणून असणार आहे.
निबंध आणि वादविवाद स्पर्धा : सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये (नाटक), नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमांचा समावेश, महिला कल्याण शिबिरे, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान “गर्व से स्वदेशी” प्रतिज्ञा, शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्ये, स्थानिक कलांवर आधारित कार्यक्रम-संगीत, नृत्य, लोकनृत्य इत्यादी, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.
या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. https://mybharat.gov.in/pages/unity_march देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी “सरदार@150 एकता मोहिमेत” सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
