जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

सध्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालक, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांना चार ते पाच तास रांगेत उभे राहून इंधन मिळवावे लागत आहे. मात्र एवढा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर देखील अनेक पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर व संतापजनक आहे.

देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “डिजिटल इंडिया” आणि “कॅशलेस इंडिया” या मोहिमांद्वारे नागरिकांनी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन माध्यमातून करावेत असे आवाहन केले आहे. शासन स्तरावर UPI, QR Code, ऑनलाइन बँकिंग यासारख्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप चालक शासनाच्या या धोरणालाच हरताळ फासण्याचे काम करीत आहेत.

रांगेत अनेक तास उभे राहिल्यानंतर अचानक “फक्त कॅश द्या” अशी अट घालण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एटीएम शोधावे लागते, पैसे काढण्यासाठी वेगळी धावपळ करावी लागते आणि अनेक वेळा इंधन न मिळताच परत जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ, मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

तसेच शेतकरी बांधवांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे पंप, जनरेटर, फवारणी यंत्रे, पॉवर टिलर यांसारखी विविध अवजारे प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते. तरीही काही पेट्रोल पंप चालक अशा शेतकऱ्यांना डब्यात पेट्रोल किंवा डिझेल देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामावर परिणाम होत आहे.

मनसे जळगाव तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विनंती करण्यात आली की,

१) जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट (UPI / QR Code / Card Payment) सक्तीने स्वीकारण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात यावेत.

२) ऑनलाइन पेमेंट नाकारणाऱ्या पेट्रोल पंपांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.

३) पेट्रोल-डिझेल टंचाईच्या काळात नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही यासाठी विशेष नियंत्रण ठेवण्यात यावे.

४) शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती अवजारांसाठी डब्यात इंधन देण्याबाबत स्पष्ट सूचना सर्व पेट्रोल पंप चालकांना देण्यात याव्यात.

५) प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाइन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे.

सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक व शेतकरी बांधवांच्या हितासाठी आपण तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली, यावेळी पुरवठा अधिकारी महेश चौधरी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल साहेब यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेशाचे पत्र काढतो असे आश्वासन दिले.

याप्रसंगी ॲड जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, महिला शाखाध्यक्ष अध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल, राहुल चव्हाण, राजेश मराठे, बादशहा शहा, अमजित खाटीक, दीपक राठोड, महेंद्र सपकाळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!